Monday, August 14, 2017

देशभक्ती डॉट कॉम

"#देशभक्ती डॉट कॉम"

आज आपल्या देशाचा '७१ वा स्वातंञ्य दिन..'
प्रत्येकाच्या मनात.. देश प्रेम अगदी ओथंबून वाहणार...
जागोजागी ध्वजारोहण.. स्वातंञ्याचं celebration बघायला मिळणार..
शुभ्र कपडे छातीवर देशाचा बिल्ला
नगरेत फुकटची आणलेली ऐट.. झालं आपण देशभक्त
म्हणायला मोकळे.. खरंय ना!

आज देशभक्तीपर गाण्याचा ढोल गल्ली ते दिल्ली
सगळीकडे वाजत राहणार..
कपडयांपासून गाडया.. कार्यालये,
शाळांमध्ये प्रतिकात्मक ध्वजांचे लेबल लावले जाणार..
पण खरंच 'देशभक्ती' आपल्या अंतर्मनात
उतरली आहे का?...

१४ ऑगस्ट पासून देशप्रेमाचा आलेला Overflow
हा १५ ऑगस्ट च्या रात्रीपर्यंत ओसरलेला असतो..
आणि दुस-या दिवशी दिसतं ते देशप्रेमाचं..
"भग्न वास्तव"..!

मला सांगा १५ ऑगस्टला अगदी अभिमानाने मिरवणारे
देशाचे symbol दुस-या दिवशी निखळून पडलेले असतात..
हिच का आपली देशभक्ती!
आणि नुसतं ध्वजाचे प्रतिक लावलं म्हणजे
आपलं देशप्रेम.. असं तर होतं नाही ना!

आज आपण या दिवसाचं Celebration करतोय..
पण खरंच आपण स्वतंत्र झालोय का..!
अजून ही गरीबी .. जातीभेद..
आणि एकंदर समाजव्यवस्था बदललेली आहे का?

मुलभूत गरजांमध्ये 'भुकेला' पहिलं प्राधान्य!
पण ते ही पुर्ण होताना जीवाची कायली होते..
मग कसलं स्वातंञ्य!

प्रगती झाली नाही असं आपण म्हणू शकतं नाही..
जगाच्या नकाशावर आपण अगदी सन्मानाने मिरवतोय..
पण देशातल्या 'चुली' अजून 'विस्तवापासून' वंचित आहेत..
आणि हे वास्तव आपण नाकारता कामा नये!

हे अगदी जळजळीत 'सत्य' आपण आपल्या
उघडया डोळ्यांनी बघतोय.. बेकारी उपासमार
दारिद्रय.. विच्छिन्न होवून ऊकिरड्यावरच्या
उष्टानासारखं उग्र दर्पाने भगभगतय आणि आपण..
आपण १ जीबीचा नेटपॕक एक तास आधी संपला
म्हणून शोक करतोय..

हे मोबाईलच खेळणं तरुणाईच्या हातात आलंय खरं
पण या इंटरनेटच्या जाळ्यानं तरुणाईचच खेळणं झालंय..
माणसामाणसातलं बोलणं बंद झालं आणि
विचारांचं मंथन चॅटिंगवर फिटींग झालंय..
अरे  हे काय चाललयं..!

रोज नवनवीन भ्रष्टाचाराचे कारनामे..
बलात्कार.. विनयभंग.. जातीचं राजकारण..
समाजवादात दडपलेला व्याभिचार..
सगळं कसं सुरळीत चालू आहे!

हो.. यासाठी आपण दोष देतोय एकमेकांना
पण स्वतःला कधीच दोषी ठरवण्यास तयार
नाही आहोत आपण..
का तर 'मुलगी जन्माला यावी.. पण दुस-याच्या घरात'
अशी संकोचित वृती झालेय आपली!

आज देशाच्या स्वातंत्र्याला ७१ वर्षे होवून
सुद्धा विचाराने अजून ही आपण..
'मागासलेल्या मानसिकतेतच' अडकलेलो आहोत.
हे योग्य आहे का?

एरवी घरातच भावबंधकीत वाटले गेलेलो आपण
कशाला देशएकजूटीच्या आरोळ्या देतोय!
वर्षभर कुळ-जात-धर्म-प्रांत यात विभागून
धन्यता मानणारे आपल्या सारखे लोक
प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य दिनादिवशी
अगदी स्वातंत्र्य सैनिक असल्याचा आव आणतो
देशप्रेमाचा पूर येतो अगदी (दिखाव्यापुरता) मनामनात!

आपल्या प्रगतीला अडथळा निर्माण होतो!
याला सर्वस्वी जबाबदार आपणच!
कारण आपण "सुज्ञ देशाचे सुज्ञ नागरीक ना..!"

दगडाच्या देवाला मनोभावे पुजणारे आपण
जीवंत जीवाला धुडकारण्यात श्रेष्ठत्व मानतो..
आयुष्यभर जीवापाड जपणा-या 'आपल्या माणसांना'
वृध्दापकाळात वृध्दाश्रमाची वाट दाखवतो..आपणचं ना!

आपण आपल्या 'माणसांचे' नाही झालो तर
'देशाचे' तरी काय होणार..!

देशाबद्दल अभिमान असावाच पण तो कृतीतून दिसावा...
आणि हे सगळं घडण्यासाठी सुरुवात ही आपणच करायला हवी..!

आज काल सामाजिक कार्यात स्वतःला
Highlight करुन घेण्यात अनेकांचा 'स्वार्थ' आहे.
पण "भुकेल्या जीवाला घास आणि अपेक्षितांची आस"
आपण जर बनू शकलो.. तर 'स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरीक'
म्हणवून घ्यायला अर्थ आहे..

"जातीच्या आरक्षणापेक्षा जातीलाच नष्ट करण्यासाठी
का एकत्र येत नाही आपण!"
एक देश आणि एकच जात "भारतीय" असं केलं
तर कधीच आरक्षणाची गरज भासणार नाही..
आणि 'जातीच्या राजकारणाची पोळी'
या राजकारण्यांची कधीच भाजणार नाही!

So याचा विचार करण्यास काहीच हरकत नाही.
थोडसं परखड पण अगदी 'मनापासूनच'
हे माझं मत आहे..!

अर्थातच 'अभिव्यक्ती स्वातंञ्यामुळे' मी हे सगळं मांडू शकलो
आणि या 'स्वातंञ्यांसाठी' देशाला सलाम...!

तरी ही अजून ही 'ख-या स्वातंञ्याच्या' प्रतिक्षेत मन व्याकुळ आहे..
आणि ते लवकरात लवकर प्राप्त होईल हीच मनस्वी आस!

सर्वांना अपेक्षित " स्वातंञ्य दिनाच्या " हार्दिक शुभेच्छा!

- शशांक कोंडविलकर

🙏💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💐🙏